Homeईपेपरआपली मुलगी पैसे कमावते याचा अभिमान वाटायला लागलाय पण....

आपली मुलगी पैसे कमावते याचा अभिमान वाटायला लागलाय पण….

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 18/3/2026 वार बुधवार.

आपली मुलगी सकाळी उशिरा पर्यंत झोपून रहाते, बाहेरचं खाणं ऑर्डर करते, मित्रांबरोबर फिरायला जाते, रात्री उशिरा घरी येते,मुलांसारखी वागते, सॅटर्डे, संडे कुठे असते माहीत नाही. याबद्दल बापाने विचारले तर मुलीपेक्षा तीच्या आईलाच जास्त राग येतो. “मला मेलीला,आयुष्यभर घरात कोंडून ठेवलेत पण मी मुलीच्या बाबतीत हे ऐकणार नाही.” असेच पुरुषांना ऐकून घ्यावे लागते.

कुलधर्म, कुळाचार याचे किती जणींना भान आहे ? वडीलधाऱ्यांचा आदर करावा, रामप्रहरी व तिन्हीसांजा देवासमोर दिवा लावलाच पाहिजे, आपल्या घरातून कोणीही रिकाम्या पोटी जाऊ नये. आपल्या घरी कोणीही अपमानित होऊ नये. घरात पूर्ण कपड्यातच फिरावे, हे सर्व आईने करावयाचे संस्कार आहेत. पण मुली घरात शाॅर्टवर फिरतात याची बापाला लाज वाटते तर आईला अभिमान वाटतो.

  आपल्या सर्व अतृप्त इच्छा महिला आपल्या मुलींच्या रुपाने पूर्ण करुन घेत आहेत.

लग्नाच्या मिरवणुकीत महिला व मुली रस्त्यावर नाचतात, त्यांचे घामाने भिजलेले अंग अनोळखी लोक न्याहाळतात तेंव्हा घरच्या कर्त्या पुरुषाची मान शरमेने किती खाली जाते याचा विचार किती महिला करत असतील ? काही बोलावे तर, “आम्ही नाचू नयेच का, आम्ही आनंद व्यक्त करुच नये का ? हे ऐकुन घ्यावे लागते.
मुलींच्या लग्नाचे बहुतेक निर्णय मुलगी व आई दोघीच घेणार, वडीलांनी मध्ये बोलणे गुन्हा होत चाललाय. मुलगी आणि तीची आई यांच्यात एक मैत्रीचं नातं होत चाललं आहे ही चांगली बाब असली तरी, मुलीच्या फाॅरवर्ड विचाराला आई कडून चालना मिळते म्हणून ही मैत्री आहे.

एखाद्या आईने चालीरीती शिकवायचा प्रयत्न केला तर लगेच त्या आईला तू जुन्या,मागासलेल्या विचारांची म्हणून हिणवायचे.

स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या मुलींची माहेरी, सासरी मनमानी तर न विचारलेली बरी. फक्त पॅकेज पाहून मुलगा पसंती, लग्न म्हणजे फक्त धिंगाणा, सासरी गेल्यानंतर जुने मित्र राहणारच. नविन नवऱ्याला वेळ देण्याऐवजी मैत्रीचा उदोउदो, सासरची मंडळी एकदम बेकिंमत. मुलाच्या आईवडिलांची स्वतःच्या घरातच निर्वासित अवस्था. एवढे करुनही किती दिवस संसार टिकणार हे कुणीच सांगु शकत नाही. कारण एकतर मुलींची सहनशीलता कमी होत चालली त्यात आईची फुस आणि स्वतःच्या पायावर उभे असल्याचा माज. शहरी मुलींची वागणूक पाहिल्यावर तर कोणत्याही वडीलांना आपल्या मुलीची लाज वाटेल.

  कोणतीही तमा न बाळगता घटस्फोट होत आहेत वर मुलगा नामर्द होता असे बिनधास्त सांगितले जाते. याला मुलींच्या आईची पाठराखण असते.

तालुका किंवा खेड्यातील बायांचा वेगळाच खाक्या. बारावी नापास मुलीलाही पुण्यातला इंजीनियरच किंवा सरकारी नोकरच हवा. त्यांच्या आईंना इंजीनियरच काम काय असतं ते पण माहिती नाही, इंजीनियर शब्दाचं स्पेलिंग येत नाही, तरीही जावई इंजीनियर पाहिजे तोही दहा लाखांवरील पॅकेजचा. काहींना वाटेल, मग खेड्यातील मुलींना इंजीनियर मिळूच नये का ? तर मिळावा  पण त्या मुलाच्या अपेक्षांना तुम्ही पण उतरा ना...?

मुलींच्या आईच्या अपेक्षा पाहून त्या माऊलीला विचारावसं वाटतं,… बाई गं तुझ्या बापानं वयाच्या कितव्या वर्षी घर बांधले ? तुझ्या नवऱ्यानं आजवर किती रुपये कमावले ?, तू वयाच्या कितव्या वर्षी लाख रुपये पाहिलेस ? स्वत: एसटी मध्ये अर्ध्या तिकिटासाठी कंडक्टरला भांडतेस, तुझ्या नव-याने रेशनच्या साखरे साठी खोटे आधारकार्ड बनवून घेतले.. आणि तूला मात्र जावायाचा थ्री बीएचके हवा, दारात लग्ना आधीच फोर व्हिलर हवी, सासु-सासरे असलेलं एकत्र कुटूंब नकोयं, हे काय चाललंय ?

स्वतःचं आयुष्य, “साधा भात-फोडणीचं वरण…, फोडणीचा भात- साधं वरण” खाण्यात गेलं, परवाच्या भाकरीत कालच्या पोळ्यांना एकत्र करुन फोडणीचे तुकडे तू खाल्लेस, हे तूझ्या लेकीला सांगून बाहेरचं खाणं ऑर्डर करणे थांबवायला सांग. गरजेपुरताच खर्च करायला शिकव, अन् यात आम्हाला मिळालं नाही तिच्या नशीबाने मिळतंय म्हणून बिघडवू देऊ नकोस.

बाई तु मुलींच्या संसारात सारखी ढवळाढवळ करतेस, तर तुझ्या मुलाच्या संसारात त्याच्या सासरवाडीची ढवळाढवळ तूला चालेल का ? सासु-सासरे, एकत्र कुटूंबात नको वाटते तर मग तुझ्या मुलाने ही असाच विचार करावा का ? फक्त अडचणीच्या वेळीच कुटूंब आठवत असेल तर ऐनवेळी तुझ्याकडे कोण येईल ?

   जी मजा एकमेकांना समजून घेऊन राहणाऱ्या एकत्र कुटूंबात आहे ती जगात कुठेही नाही हे कधी कळणार आहे ?

सर्वच महिला न कळणा-या अशा आहेत असे अजिबात नाही. अनेक महिलांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही स्वतःच्या हिंमतीवर घर तोलून धरलेली उदाहरणे आहेत 
  शेवटी एवढंच सांगावे वाटते की, महिलांनो आणि मुलींनो.. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण टाळा, आपल्या अपेक्षांना आवर घाला. साधेपणात जी सुंदरता आहे ती भंपकपणात नक्कीच नाही. मध्यमवर्गीय संसार थाटण्यात काही कमीपणा नाही. घरातील एकच भाकरी अर्धीअर्धी खाल्लात तर नवरा बायकोचे प्रेम नक्कीच वाढेल. जेमतेम बचत करुन एखादी वस्तू खरेदी करुन पहा, तुमच्या आनंदाला पारावार रहाणार नाही.

संस्कृती जपा, कुलधर्म कुलाचार, सणवार साजरे करा. मोठ्यांचे मानसन्मान ठेवा, घराचे घरपण सांभाळा. बचत करा, हौसमौज घरच्यां बरोबर करा, आयुष्य फार सुंदर आहे. फक्त पैसा / पॅकेज म्हणजेच सर्वकाही, हे मनातून काढून टाका.

सामान्य महिलेच्या लेखणीतून 🙏🙏🙏🙏⚖️🤷🏼‍♂️⚖️

RELATED ARTICLES

Most Popular